पिंपरी : कॅशलेस व्यवहार होण्यासाठी अनेक भाजी विक्रेत्यांनी हायटेक होण्याकडे पावले उचलली. मात्र त्यांना रोखीनेच विक्री करावी लागत होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. म्हणूनच पिंपरी चिंचवडमधील एका भाजी विक्रेत्यांकडे ग्राहक मोठी गर्दी करत आहेत.


पिंपरी चिंचवडमधील भाजी मंडई सुट्ट्या चलनाअभावी ओस पडली असताना समीर गरुड या भाजीविक्रेत्याच्या ठेल्यासमोरील गर्दी पाहून सर्वच विक्रेते अचंबित झाले आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याने सर्वत्र सुट्ट्या पैशांचा अभाव आहे. याचा मोठा फटका भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांनाही बसलाय.

समीर गरुड मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. समीर यांनी गेल्या महिन्यात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी, पेटीएम आणि स्वाईप मशीनची सुविधा ग्राहकांसाठी सुरु केली. समीर हायटेक झाले, मात्र ग्राहक रोखीने व्यवहार करण्यावरच भर देत होते. अशातच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या आणि काय बदल झाला, ती समीर यांच्या दुकानासमोरील गर्दीच सांगते.

गेली महिनाभर पचनी न पडलेली हायटेक सुविधा आता मात्र ग्राहकांना सोईस्कर वाटत आहे. बँक, पोस्ट आणि एटीएम बाहेर रांगा लावण्याऐवजी नागरिक कॅशलेस व्यवहार करून समीर यांच्याकडून भाजी खरेदी करत आहेत.

काळा पैसा रोखणे, बनावट नोटा चलनातून हद्दपार करणे यांच्यासह नागरिकांनी कॅशलेस व्यवहाराकडे वळावं, हा देखील पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामागचा एक हेतू आहे. त्यामुळे समीर गरुड हे त्याचच एक उदाहरण म्हणता येतील.