Petrol Pump : सामान्यांप्रमाणे आता पेट्रोल पंपावरही  'महिना अखेर'  असल्याचे चित्र दिसण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयांविरोधात देशभरातील पेट्रोल पंप चालक-मालकांनी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोप पंपावर इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला आहे. 


इंधन खरेदीवर बहिष्कार का?


देशात वाढलेले पेट्रोल - डिझेलचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. प्रवास खर्चात वाढ झाल्यानं महागाई देखील वाढू लागली. काही दिवसांपूर्वी तर महागाईनं आजवरचा उच्चांक गाठल्याची आकडेवारी देखील समोर आली होती. दरम्यान, या साऱ्या घडामोडींमध्ये केंद्र सरकरानं पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठी कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील मिळाला. पण, त्यामुळे पेट्रोल - डिझेल चालक - मालक मात्र आक्रमक झाले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर सर्वांना हजारो कोटींचा फटका बसल्याचे आकडे देखील समोर आले. यामध्ये कमी म्हणून कि काय राज्य सरकारनं देखील दरांमध्ये कपात केली. पण, राज्य सरकारची दरवाढ फसवी आणि धुळफेक करणारी असल्याची टीका विरोधकांनी केली. 


या साऱ्या घडामोडींमध्ये मात्र केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरातील चालक - मालक 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून किंवा ऑईल डेपोमधून पेट्रोल - डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावे किंवा ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं 'फामपेडा'चे अध्यक्ष उदय लोध यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. याची कल्पना सरकारला देखील दिली जाणार आहे. अर्थात या साऱ्या गोष्टी नियमांच्या आधारेच केल्या जाणार असल्याचं देखील लोध यांनी स्पष्ट केलं आहे. 


सामान्यांना पेट्रोल - डिझेल मिळणार नाही? 


दरम्यान, देशभरातील पेट्रोल - डिझेल चालक मालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार त्याचं काय? असा सवाल देखील यावेळी 'एबीपी माझा'नं उदय लोध यांना केला. त्यावेळी बोलताना लोध यांनी 'सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे याचा फटका बसणार नाही. प्रवाशांना त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे 31 मे रोजी आम्ही पेट्रोल-डिझेलची खरेदी करणार नाहीत याचा अर्थ सामान्यांना मात्र इंधन मिळणार आहे. त्याची खबरदारी आम्ही घेतली आहे किंवा त्याबाबतच नियोजन करूनच हा निर्णय घेतल्याचं देखील लोध यांनी स्पष्ट केलं आहे.  त्यामुळे नो पर्चेसचा कोणताही फटका सामान्यांना बसणार नाही असेही त्यांनी म्हटले. वर्ष 2017 पासूनचं सारं गणित समजून घेतल्यास याबाबतचा सर्व तपशील ध्यानात येईल' अशी प्रतिक्रिया दिली. 


'नफा कमवता त्याचं काय?'


दरम्यान, 'नो पर्चेस'चा निर्णय घेताना तुम्ही वाढलेल्या दरांचं कारण देत आहात. पण, दरवाढ झाल्यावर मात्र तुम्ही नफा कमावता? याबाबत देखील 'माझा'नं लोध यांना सवाल केला. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, नफा कमावण्यासाठी प्रत्येक जण व्यवसाय करतो. आम्हाला देखील नफा मिळतो. पण, यामध्ये असलेली गुंतवणूक देखील मोठी असते. दर चढणे आणि उतरणे या बाबींवर देखील नफ्याची गणितं असतात. दर कपात झाल्यानंतर आम्हाला गुंतवणूक कमी करावी लागणार आहे ही बाब जमेची आहे. पण, एका रात्रीत दरकपात झाल्यानंतर होणारा तोटा देखील असतोच. दर कपात करताना ती अचानकपणे होता कामा नये. त्याची कल्पना मिळणं किंवा देणं गरजेचं आहे. जेणेकरून ग्राहकांना कोणताही त्रास न होता इधंन खरेदी केली जाईल. अशारितीचं अचानकपणे दरकपात केल्यास आम्हाला देखील मोठा फटका बसतो. ही च बाब सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक दिवसांचा नो पर्चेस करत आहोत. यामध्ये आम्ही कुठंही प्रवाशांना किंवा सर्वसामान्यांना अडवत नाहीत किंवा त्यांची गैरसोय करत नाहीत हि बाब लक्षात घ्यावी.