बीड: शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 1 रुपयांपासून ते अनेक रुपयांपर्यंत जमा झाल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र हे एकाच शेतकऱ्याच्या बाबतीत झाला असेल असा आपला समज असतो. पण बीडमधील शेतकरी पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांची यादी पाहिली तर चकीत व्हाल.


बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 आणि दोन रुपये अशी रक्कम टाकून विमा कंपनीनं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.

बीडमधील 773 शेतकऱ्यांना एक रुपया,649 शेतकऱ्यांना दोन रुपये,50  शेतकऱ्यांना तीन रुपये, 702  शेतकऱ्यांना चार रुपये, 39 शेतकऱ्यांना पाच रुपये एवढीच रक्कम खात्यावर जमा झाली आहे. पिकांचं नुकासन झालं म्हणून या शेतकऱ्यांना एव्हढी ‘मोठी’ रक्कम पीकविम्यारुपी भरपाई म्हणून मिळाली आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदुरघाट शाखेत शेतकरी गेल्यानंतर त्यांना पीकविम्याची यादी पाहून धक्काच बसला. आपल्या नावावर 1 ते 5 रुपयांपर्यंत रक्कम जमा झाल्याचं पाहून हसावं की रडावं हेच त्यांना कळत नव्हतं.

खरंतर बीड जिल्ह्यानं पीक विमा भरून घेण्यात देशात पहिला नंबर मिळवला होता. जिल्हा बँकेच्या नांदुरघाट शाखेतून 15691 शेतकऱ्यांनी युनाटेड इन्शुरन्स कंपनीकडे 51 लाख 42 हजार रुपयांचा विम्याचा हप्ता भरला होता.

मात्र विमा कंपनीने भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर एक दोन रुपये टाकून क्रूर थट्टा केली आहे. लहरी हवामान, पावसाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे नापिकी झाल्यास शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारनं पीकविमा योजना आणली. पण पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरु आहे.

विमा कंपन्या मात्र हजारो कोटी रुपयांचा नफा कमतवत तुंबड्या भरत आहेत. तर दुसरीकडे गरीब शेतकरी आणखी कंगाल होत आहे. त्यामुळे सरकारची पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.