पल्स इंडियाच्या एजंटची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2017 07:42 AM (IST)
प्रातिनिधिक फोटो
सोलापूर: पल्स इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या खातेदारांच्या त्रासाला कंटाळून सोलापूरमधील पल्सच्या एका एजंटने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापुरातील माळशिरस तालुक्यात ही घटना घडली असून राजकुमार पांडुरंग बाबर असं या एजंटचं नाव आहे. गेली १६ वर्षे राजकुमार बाबर पल्स इंडियाचे काम करीत होते. त्यांच्यामार्फत खातेदारांनी जवळपास १ कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीमध्ये केली होती. मात्र, कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने खातेदारांनी या पैशासाठी बाबर यांच्याकडे तगादा लावला होता. कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांनी हात झटकल्याने बाबर खूपच निराश झाले होते. यातच पैशासाठी वारंवार येणाऱ्या फोनमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या बाबर यांनी काल आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली.