शिर्डी : साई जन्मभूमीवरुन शिर्डीकरांनी बंद पुकारल्याने हा वाद आता चिघळायला सुरुवात झाली आहे. सर्वात महत्वाचा विषय या वादात येतोय तो पुराव्यांचा. शिर्डीकर म्हणताहेत एकही पुरावा साईजन्माचा पाथरीकरांकडे नाही. मात्र, पाथरीकरांनी एक नाही तर तब्बल 29 पुरावे जमा केले आहेत. दरम्यान, पाथरीला साईबाबांचंच जन्मस्थळ घोषित करण्याला तीव्र विरोध करत शिर्डीत आजपासून बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिर्डीच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी सुरुवातीला पाथरीच्या रहिवाशांनी देखील बंद पुकारला होता. मात्र, सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्यानं पाथरीवासियांनीं बंद मागे घेतला आहे. मात्र, शिर्डीकरांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पाथरीमध्ये साईबाबांचा गजर सुरू केला आहे.

  • पाथरींकडे साईबाबांच्या जन्मस्थाना संदर्भात असलेले महत्वाचे पुरावे -
    1985 ते 90 दरम्यान शिर्डी येथील साई संस्थानचे विश्वस्थ तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचे चिरंजीव विश्वास खेर यांनी 1972 पासून साई जन्मभूमी च्या संशोधनास सुरुवात केली.

  • 1972 ची साई सचरित्राची आठवी आवृत्ती अध्याय 7 वा उल्लेख इथून संशोधनाला सुरुवात झाली.

  • साई संस्थानने 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साई सच्चरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरीचा उल्लेख आहे. मात्र तो पाथर्डी नावाने करण्यात आलेला आहे.

  • साई संस्थाननेच 1974 साली प्रकाशित केलेल्या इंग्रजी साई सच्चरित्रात साई बाबा त्यांच्या म्हाळसापती यांना माझा जन्म पाथरी येथे ब्राम्हण कुटुंबात झाला आहे, असं सांगितल्याचा उल्लेख ही आहे.

  • संत दासगणू महाराज यांच्या 1925 च्या श्री भक्तिसारामृत मधील सातव्या खंडातील ओवी मध्ये कृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म शेलू मानवत म्हणजेच पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितले आहे.

  • 1978 लाच त्यांनी साई बाबा ज्या भुसारी घराण्याचे होते, त्या भुसारी घराण्याचे शेवटचे रघुनाथ भुसारी यांच्याकडुन पाथरी येथील सध्याची मंदिराची जागा जिथं बाबांचं घर जतन करण्यात आलंय. ती 5000 ला विकत घेऊन पुढे काम सुरू केले.

  • पाथरी नगर परिषदेकडे साई बाबांचे वडील अण्णासाहेब भुसारी यांच्या घराची नोंद आहे.

  • साई मंदिरात साई बाबांच्या आई-वडील आणि त्यांनी वापरल्या अनेक वस्तूंचे जतन करण्यात आले आहेत.

  • साई बाबांनी वापरली त्यावेळीची उडी जिला आजही कापराचा वास आहे. ती ही साई संस्थान पाथरीकडे आहे.


आजपासून शिर्डीत बेमुदत बंद, पाथरीला साईबाबांचं जन्मस्थळ घोषित करण्यास तीव्र विरोध


काय आहे वादामागील कारण?
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाला तोंड फुटले. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Special Report | पाथरी-शिर्डी वादाचा नवा अंक, साईंची शिर्डी संपावर | ABP Majha