परभणी : केंद्र सरकारसह बहुतांश राज्यातील सत्ता गेल्यानंतरही  काँग्रेसमधील (Congress)  अनेक नेते अजुनही जमिनीवर यायला तयार नसल्याचे चित्र सध्या कायम आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ देशपातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवरही तुटत चालली आहे. परभणी जिल्ह्यात काँग्रेसला लागलेली गळती याचेच उदाहरण म्हणावे लागणार आहे. मागच्या 15 दिवसात परभणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या हातात असलेल्या दोन नगर परिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी काँग्रेस सोडल्यानंतर परभणी महापालिकेत सत्ता असताना एका काँग्रेस नगरसेवकाने पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. ज्यामुळे पक्षातील नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आली. 


परभणी जिल्ह्यात लोकसभा आणि परभणी विधानसभा सोडली तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता अनेक वर्षांपासून कायम आहे .सध्याचे पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर मागच्या विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि जिंतूर मधील रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नंतर विधानसभेत वरपुडकर यांच्या रूपाने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आमदार लाभला.  तसेच जिल्हा परिषद, नगर परिषदा, जिल्हा बँक, महानगरपालिका अशा जिल्ह्यातील जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत. परंतु मागच्या महिना भरापासून काँग्रेसमध्ये पक्ष सोडण्याच सत्र सुरु झालंय हे सत्र सोनपेठ,गंगाखेडमार्गे परभणीत पोचले आहे. 


सोनपेठ नगर परिषदेवर 22 वर्षांपासून काँग्रेसचे एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी सर्व 11 नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मुंबईत या प्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होते. मी 22 वर्षापासून काँग्रेसचे काम करतोय आणि सोनपेठ नगर परिषद ही कायम आपल्या ताब्यात ठेवलेली आहे असं असताना माझे नगराध्यक्ष अपात्र होत असताना पक्षाच्या वरिष्ठांना सांगून ही कुणी मला मदत करत नसेल तर मग अशा पक्षात राहून काय उपयोग असं चंद्रकांत राठोड यांनी सांगितले.


चंद्रकांत राठोड यांच्या प्रवेशांतर गंगाखेड पालिकेचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी ही 16 नोव्हेंबर रोजी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगर परिषद चालवत असताना इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडचणी वाढल्या मात्र असं असताना पक्ष म्हणुन कुणीच आमच्या मागे उभे राहत नसल्याने शेवटी शिवसेनेचा पर्याय निवडल्याचे तापडिया यांनी सांगितले.


आता सोनपेठ आणि गंगाखेड नगर परिषदा काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर पक्ष सोडीचे लोन परभणीत पोचले.परभणी महानगरपालिकेवर काँग्रेस ची सत्ता असताना काँग्रेस चे नगरसेवक सचिन देशमुख यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेवर सत्ता काँग्रेस ची असताना हुकूमशाही सुरूय असा आरोप त्यांनी केलाय शिवाय मी शहर विकासाची मुद्दे मांडत असताना माझ्याच भूमिकांना वारंवार विरोध केला जात आहे.याबाबत मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर,उपमहापौर भगवान वाघमारे यांच्याशी अनेक वेळा बोललो मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मला आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागला अशी प्रतिक्रिया नगरसेवक सचिन देशमुख यांनी यावेळी दिलीय.. 


स्वार्थासाठी पक्ष बदलणे हेच यांचे काम काँग्रेसवर कुठलाही परिणाम होणार नाही-काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर सोनपेठचे असो कि गंगाखेडचे नगराध्यक्ष दोघांचे हि स्वार्थासाठी पक्ष बदलणे हेच काम आहे.काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी परभणीत आले होते तेंव्हा हे त्या कार्यक्रमाला हि आले नव्हते,पक्षवाढीसाठी अथवा पक्षाच्या कामासाठी कधीही यांनी पुढाकार घेतला नाही जिकडे सत्ता तिकडे हे जातात यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय.. 


दरम्यान राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी मिळून महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे परंतु स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षवाढीसाठी अनेक उपक्रम राबवताना दिसत आहेत शिवाय इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात सामील करून घेत असताना काँग्रेसच्या नेत्यांकडून मात्र पक्षवाढीच्या अनुषंगाने प्रयत्न केलेलं दिसत नाहीतच शिवाय जे पक्ष सोडत आहेत त्यांच्याकडे हि स्थानिक नेत्यांचे लक्ष नसल्याने आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच जिल्हयात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.