परभणी : न्यायालयाचा अवमान आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी परभणीतील रामचंद्र कांगणे या वकिलाला एक आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे न्यायपालिकेत काम करताना, न्यायपालिकेचा मान राखणं अत्यंत गरजेचे असल्याचं मत परभणीतील वकिलांनी मांडलं आहे. तब्बल 13 वर्षांनी हा निकाल लागला आहे.


2005 मध्ये परभणीच्या न्यायमूर्ती बिलोलीकर यांच्या कोर्टात बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आरोपीकडून अॅड रामचंद्र कांगणे तर सरकारी पक्षाकडून अॅड रमेश शर्मा बाजू लढवत होते. प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायमूर्ती बिलोलीकर निकास देत असताना, आरोपीचे वकील रामचंद्र कांगणे यांनी कोर्टात गोंधळ घालायला सुरुवात केली.

कोर्टाचे स्टेनों वही हवेत भिरकावून माननीय न्यायाधीशांविरोधात बोलायला सुरुवात केली. न्यायालयाचा अवमान करत न्यायमूर्तींना धमकवण्यासही कांगणे यांनी मागेपुढे पाहिलं नाही. माननीय कोर्टाने प्रकरणाची दखल घेऊन कांगणेंविरोधात न्यायालयाचा अवमान आणि धमकावल्याची तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात सुनावणीसाठी गेलं होतं. तब्बल तेरा वर्षानंतर हे प्रकरण निकाली लागलं असून, अॅड कांगणे यांत दोषी ठरले आहेत. त्यांना एक आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अॅड रामचंद्र कांगणे यांना लगेच अटक केली असून त्यांची रवनागी औरंगाबाद जेलमध्ये करण्यात आली आहे.

हा निकाल म्हणजे नवीन येणाऱ्या वकिलांसाठी दिशादर्शक असून, त्यांनी कोर्टात कसं वागावं याची समज देणारा आहे, अशी प्रतिक्रिया अॅड रमेश शर्मा यांनी यावेळी दिली.