Ashadhi Wari 2022 : विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज ABP माझाने समोर आणल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला असून या अहवालानुसार मूर्तीला हानिकारक ठरणाऱ्या ग्रॅनाईट फारशा तातडीने काढण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच सोबत देवाला अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर याचा अत्यंत मर्यादित स्वरूपात वापर करून अभिषेकासाठी क्षारमुक्त आरओ पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा भिषेक करताना देवाच्या डोक्यावरून अतिशय हळू वेगात पाणी घालण्याचाही निर्णय घेण्यात आला. 


विठ्ठलाचा गाभारा लहान असून येथे भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ह्युमिडिटी तयार होते . याचाही परिणाम मूर्तीवर होत असल्याने येथे टेम्परचर सेन्सर लावण्यात येणार आहे . मूर्तीसाठी साधारण 22 ते 25 डिग्रीपर्यंत तापमान राखणे आवश्यक असल्याने त्याच पद्धतीने भाविकांना मर्यादित संख्येत गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे . सध्या गाभाऱ्यातील तापमान 32 ते 35 डिग्री पर्यंत जात असल्याने या उष्णतेचा त्रास मूर्तीला होत असतो . याशिवाय गाभाऱ्यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी चौखांबी मध्ये व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. 


देवाच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे फळे आणि देशी विदेशी फुलांमुळे देखील मूर्तीला त्रास होत असल्याने ही सजावट गाभारा आणि चौखांबीच्या बाहेर करण्यावर विचार केला जात आहे . याबाबत देखील पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन होणार आहे . सध्या रुक्मिणीमातेच्या पायाची झालेली झीज पूर्ववत करण्यासाठी वज्रलेप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुरातत्व विभागाकडून वेळ नक्की केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. रुक्मिणीच्या पायाची झीज झाली असताना हे समितीच्या निदर्शनास का आणून दिले नाही असा विषय बैठकीत होऊन याबाबत जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 



Ashadhi Wari : आषाढी वारीची घोषणा; ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या पालखीचं 'या' तारखेला पंढरीकडे प्रस्थान