पंढरपूर : वैशाख वणव्याची दाहकता जणू चैत्रातच जाणवू लागली आहे. त्यासोबतच विठुरायाच्या परंपरागत चंदन उटी पूजेलाही सुरुवात झाली. यावर्षी प्रथमच मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत मशिन आणलं आहे. त्यामुळे रोज दहा कर्मचाऱ्यांना आता सहाणेवर तासनतास चंदन उगाळावं लागणार नाही.


देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येतं. यापूर्वी हे चंदन उगाळण्यासाठी दहा कर्मचारी सलग चार महिने हे काम करत असत. मात्र आता मंदिर समिती हायटेक होत असून जळगावहून हे चंदन उगाळण्याचं मशिन आणलं आहे.



पुढचे तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ आहे. विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा, यासाठी शीतल चंदनाचा लेप त्याच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचं चंदन मागवण्यात येतं. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदनयुतीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते.

विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली. भाविकांच्या हस्ते ही चंदन उटी पूजा होणार असून यासाठी मंदिर समितीकडे 25 हजार रुपये भरावे लागतात.