पंढरपूर : अठ्ठावीस युगे पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर असलेला विठुराया आता सोन्याच्या विटेवर उभा राहणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या खजिन्यात भक्तांनी अर्पण केलेले सोन्याचे दागिने वितळवून विटा तयार केल्या जाणार आहेत.


विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून दीड कोटी भाविक येत असतात. विठ्ठलभक्त आपापल्या ऐपतीनुसार दान अर्पण करतात. गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलचरणी दान झालेल्या हजारो वस्तू सांभाळणं मंदिर समितीसाठी जिकिरीचं बनू लागलं आहे.

खजिन्यात भेट आलेल्या सोन्याच्या 25 किलो आणि चांदीच्या 830 किलो वस्तू सध्या आहेत. नोंद आणि देखभालीसाठी त्या वितळवून त्यापासून विटा बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

याचा वापर भाविकांच्या सुविधांसाठी कशाप्रकारे करता येईल, यावर समिती विचार करत आहे. नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून राज्य शासनानेही 2015 साली एक अध्यादेश काढून देवस्थानाच्या भेट आलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत सूचना दिल्या आहेत.