पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिला आयएएस अधिकाऱ्यासाठी कृष्णाच्या रुपानं धावणार का? हा प्रश्न आहे. कारण पालघर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेनं काढलेल्या मोर्चावेळी आपल्याला मानसिक छळ सहन करावा लागला, असा आरोप पालघर झेडपीच्या सीईओ निधी चौधरी यांनी केला आहे. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्कीमुळे आपली अवस्था आजही द्रौपदी किंवा सीतेपेक्षा वेगळी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


निधी चौधरी या 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी. सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या त्या सीईओ आहेत. पण रेड कार्पेट सर्व्हिसमध्येही त्यांना सीता आणि द्रौपदीसारखी अगतिकता सहन करावी लागत आहे.

प्रकरण 24 एप्रिलचं आहे. श्रमजीवी संघटनेनं विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. पालघर जिल्ह्यातील बालकांना सकस आणि दर्जेदार आहार मिळावा, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवावं अशा मागण्या होत्या. यावेळी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी निधी चौधरींना घेराव घातला. धक्काबुक्की केली. त्यामुळे व्यथित झालेल्या निधी यांनी ट्विटरवरुन आपला संताप, अगतिकता व्यक्त केली.

'भगवान कृष्णामुळे द्रौपदी वाचली. इथं पोलीस अधिकाऱ्यांमुळे अनुचित घटना टळली. पण अजूनही छळवाद थांबलेला नाही.
सीतेला तिच्या इच्छेविरोधात अशोकवनात डांबणं, आणि महिला अधिकाऱ्याला घेराव घालून बंदी करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत का?' असा सवाल निधी यांनी ट्विटरवरुन केला आहे. ज्याची दखल घेऊन श्रमजीवीच्या विवेक पंडितांसह 17 जणांना अटक करण्यात आली आहे.



श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र निधी चौधरी यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. एखाद्या आयएएस महिलेला जर इतका मनस्ताप सहन करावा लागत असेल, तर राजकीय दबावाखाली नेमकं काम तरी कसं होणार? हा प्रश्न आहे.

सामाजिक आणि राजकीय आंदोलनं हा नित्याचा भाग आहे. लोकांच्या हितासाठी लढताना महिला अधिकारी आणि त्यांच्या सन्मानाला धक्का लागू नये, याचीही काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे. नाहीतर आजच्या युगातही सीता, द्रौपदीला रावणाचा धोका असल्याचा आभास समाजासाठी आणखी धोकादायक ठरु शकतो.