पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. संपूर्ण देशभर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अचानक घटनास्थळाला भेट दिली आणि प्रकरणाचा आढावा घेतला. या दौऱ्यानंतर आज संध्याकाळी अनिल देशमुख यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली असल्याचं सांगितलं.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, गावातील सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून त्या दिवशीचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेतला होता. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी अनिल देशमुख यांनी गडचिंचले हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचा पुनरुच्चार केला.


पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका : शरद पवार


पालघर प्रकरणात नेमकं काय घडलं?


मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.


VIDEO | एका अफवेनं घडलं सर्वात भयंकर हत्याकांड, नेमकं काय घडलं होतं? स्पेशल रिपोर्ट


पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली.