दोन लहान मुलांच्या वादातून पेटलेल्या पालमची परिस्थिती नियंत्रणात
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2019 10:59 AM (IST)
परभणीतील पालम शहरात काल संध्याकाळी दोन गटात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली. त्यानंतर हाणामारी होऊन दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती.
परभणी : दोघा लहान मुलांच्या भांडणातून परभणीतील पालम शहर पेटलं होतं. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीचं पर्यवसन जाळपोळीत झालं. सुदैवाने पालम शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. पालम शहरात काल संध्याकाळी दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता जमावाने शहरातील मुख्य चौकातील काही दुकानांवर दगडफेक केली. याशिवाय चार दुचाकी, तीन हातगाड्या, टायर्सची जाळपोळ केली. या घटनेमुळे पालम शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जाळपोळीमुळे शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. घटनेचं गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी चोख बंदोबस्त तैनात केला. आता पालममधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जनजीवनही पूर्वपदावर आलं आहे. पोलिसांकडून आता जवळपास 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.