Paani Foundation News : राज्यात जलसंवर्धनासाठी मोठं काम करत असलेल्या पानी फाऊंडेशनचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. अमेरिकेतील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधील सुप्रसिद्ध पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी यासंदर्भात एक महत्वाचं संकलन केले आहे. यात त्यांनी पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 महत्वाच्या उपक्रमांची दखल घेतली आहे. यात पानी फाउंडेशनचे कार्य प्रथम क्रमांकाचं असल्याचे नमूद केले आहे.


नुकतंच पर्माकल्चर प्रशिक्षक अँड्र्यू मिलिसन यांनी पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या जगातील 5 सर्वात प्रभावी प्रकल्पांबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ टाकला आहे. यात त्यांनी Arvari River Restoration, The Chikukwa Project, GRAVIS Jodhpur, The Loess Plateau, The Paani Foundation या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. 



वॉटर हार्वेस्टिंगसाठी पानी फाऊंडेशननं केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. या प्रकल्पांमुळं महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणी पातळीत वाढ झाली आहे. 45 दिवसांच्या या स्पर्धेनं पावसाळ्यातलं पाणी जागेवर मुरलं जात आहे. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत असून उत्पादनात वाढ होत आहे. जगासमोर हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे. यामुळं हा प्रकल्प नंबर एक असल्याचं अँड्र्यू मिलिसन यांनी म्हटलं आहे. 


अँड्र्यू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती


पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी अँड्र्यू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती. पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी केलेले काम पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून त्यांनी याचा गौरव केला होता. त्यांनी त्यावर एक लघुपटही बनवला असून तो आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे. पानी फाऊंडेशन पाण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.


आमिर खान, किरण राव, रीना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनी या संस्थेची स्थापना केली असून पाणी फाऊंडेशनचा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे. पर्माकल्चर म्हणजे शेतीला टिकाऊपणा आणि स्वावलंबित्व प्रदान करण्यासाठी पर्यावरणीय प्रणालींचा विकास करणे. निसर्गाकडे पाहण्याचा हा एक समग्र दृष्टीकोन आहे आणि पारंपरिक तंत्राच्या अवलंबाचे मुख्य उद्दीष्ट आपल्याला स्वयं निर्माता बनवते, असं अँड्र्यू मिलिसन यांनी म्हटलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या



टीमवर्कमधून समृद्ध गावांची निर्मिती शक्य; पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य


आमिर खानचा सोशल मीडियाच नाही, तर मोबाईललाही बाय बाय, माझा कट्ट्यावर सांगितलं कारण