उस्मानाबाद: अॅट्रॉसिटी कायद्यामुळं गावा-गावात तणाव नाही, पण टोकाचे वाद आहेत. एका खुल्या जागेच्या वादातून अॅट्रॉसिटीपर्यंत प्रकरण गेल्यामुळं उस्मानाबादच्या अंबेजवळग्यात जाधव आणि कांबळे कुटुंब 25 वर्षापासून इरेला पेटलंय. त्यामुळंच अॅट्रॉसिटीत बदल करण्याचा मुद्दा कळीचा ठरतोय


उस्मानाबादच्या मराठा मोर्चात अजिनाथ जाधव हिरिरीनं सहभागी झाले. किडनीचं ऑपरेशन झाल्यावरही पायी ३ किलोमीटर चालत गेले. त्याचं कारण म्हणजे 50 बाय 30 ची खुली जागा.

पुण्याला स्थलांतरीत झालेल्या शिरीष कुलकर्णींनी ही जागा 1992 साली जाधवांना 3 हजारात विकली. जागेची रजिस्ट्री जाधवांच्या नावे आहे. पण जाधवांच्या आधी कुलकर्ण्यांनी कांबळेंशी जागा खरेदीची बोलणी केल्याचा कांबळेंचा दावा आहे.



जागेचा ताबा घेण्यावरून जाधव आणि कांबळे कुटुंबात वाद सुरु झाला. त्यातून 1992 साली कांबळेंनी जाधवांवर अॅट्रॉसिटी दाखल केली. जाधव नवरा-बायको आणि 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अटक झाली. जाधव कुटुंब ३ दिवस पोलिस कोठडीत होतं. अल्पवयीन मुलीला पोलिसांनी सोलापूर रिमांड होमला पाठवलं.

आम्ही तर भांडणात नव्हतो..पण आम्हाला अटक झाली..दीड वर्षाचा मुलगा सोबत होता, असं हिराबाई जाधव सांगतात.



अॅट्रॉसिटीनंतर दोन कुटुंबात दोन वेळेस हाणामारी झाली. प्रत्येक वेळी आपल्याच नातलगांनी कांबळेंना मदत केल्याचा जाधवांचा आरोप आहे.

दीड हजार स्क्वेअर फुटाच्या जागेचा वाद तालुका न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत गेला. प्रत्येक ठिकाणी निकाल जाधवांच्या बाजूने लागले. तरीही पोलिस फौजफाटा लावूनही जाधवांना जागेचा ताबा मिळालेला नाही. वाद वाढतच चाललाय.

आता तर एमए बीएड मुलांवर गुन्हे दाखल होवू नयेत, म्हणून जाधव कुटुंबानं मुलाला परगावी दुकान थाटून दिलं आहे.



जाधवांना 40 गुंठे शेतजमीन आहे. कांबळे शेतमजूर. पण प्राण गेले तरी हरकत नाही. पण जागा सोडायला दोघेही तयार नाही.

गावची पंयाचत, तंटामुक्त समिती, पोलिस सगळेजण 25 वर्षापासूनचा किरोकोळ जागेचा वाद मुकपणे पाहात आहेत.

अशा वादाचं हे चित्र सार्वत्रिक नाही...म्हणजे दलितांची परिस्थिती खूप सुधारली, त्यांना सवर्णा साराखाचं मानसन्मान मिळतोय. दलितांविषयी मनात तरी तुच्छतेची भावना नसते असं कोणी म्हणत असेल तर ते भाबड चित्र आहे. म्हणजे आजही अँट्रोसिटीच्या कायद्याची प्रसंगी गरज पडतेच. पण अँट्रोसिटीचा गैरवापर होतच नाही असं म्हणणं तर त्याहून मोठा भाबडेपणा आहे. समाज म्हणून सगळ्यांना अत्मपरीक्षणाची गरज आहे.

VIDEO:



 

राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद