मुंबई : नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे गुण आता बंद होणार आहेत. भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे.


यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे.

नववी आणि दहावी या दोन इयत्तांसाठी सध्या भाषा आणि द्वितीय भाषा विषयांसाठी तोंडी परीक्षा घेतल्या जातात. यात 20 गुण हे तोंडी परीक्षेसाठी असतात. हे गुण देण्याची मुभा शिक्षकांना असते. त्यामुळे अनेकदा शिक्षक पैकीच्या पैकी गुण दिले जातात. त्यामुळे नववी आणि दहावीचा निकालही वाढलेला दिसतो.

राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक पार पडली. यात परीक्षेचा पॅटर्न बदलण्यावर निर्णय झाला. त्यामुळे यापुढे भाषा विषयांसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल.