नागपूर : शेतकऱ्यांच्या नावे विजेचं वाढीव बिल पाठवलं असेल, तर ते आम्ही परत करु असं, अश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. आज नागपुरात ते एबीपी माझाशी बोलत होते.

33 लाख शेतकऱ्यांच्या नावे 6 हजार कोटींचे वाढीव वीज बील पाठवल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी एबीपी माझाच्या पाठपुराव्याला राज्य सरकार योग्य दिशा देईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ऊर्जामंत्री म्हणाले की, ''राज्याच्या ऊर्जामंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, 36 जिल्ह्यांचा प्रवास केला. यावेळी वाढीव बिल आकारणीसंदर्भातील अनेक तक्रारी माझ्यासमोर आल्या. यानंतर या प्रकरणाचा अभ्यास करण्याचं काम आयआयटी पवईला दिलं. त्यांनीही आपल्या अहवालात वाढीव बिल आकारल्याचं नमूद केलं होतं. यामुळे याची मुख्य कंपनी असलेल्या डिस्कॉमचं मत जाणून घेत आहे.''

वीजबील थकबाकी बाबत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, ''शेतकऱ्याकडून सध्या 22 हजार कोटीचं वीजबील थकीत आहे. त्यातलं सहा हजार कोटीचं वसूलचं केलं नाही. जर ते वाढीव बिल किंवा चुकीचं बिल असेल, तर ते दुरुस्त करण्याचं काम करेन.''

वाढीव वीजबीलच्या आकारणी बद्दल बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, ''काही ठिकाणी दुष्काळ असतानाही, तिथं बिलिंग सुरुच होतं. त्या भागातलं बिल जिल्हाधिकाऱ्याच्या अहवालानुसार सरसकटच बिल कमी करावं लागेल. त्यामुळे आयआयटी पवईचा अहवाल आणि डिस्कॉमचं मत, यावरुनच शासन निर्णय घेईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.''

या प्रकरणी एबीपी माझानं पाठपुरावा केल्यानं त्यावर बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, एबीपी माझाच्या पाठपुराव्यावर राज्य सरकार योग्य ते निर्णय घेईल.

संबंधित बातम्या

भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी 33 लाख शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं