चंद्रपूर : संघर्षयात्रेत बडेजाव टाळा असे आदेश विरोधी पक्षांनी दिले असले तरी त्याचा प्रत्यय संघर्षयात्रा सुरु होण्यापूर्वीच आला. एसी बसमधून विरोधी पक्षांचे आमदार चंद्रपुरात दाखल झाले.


शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू करकाडेच्या कुटुंबियांना भेटून संघर्षयात्रेला सुरुवात होईल.

https://twitter.com/NCPspeaks/status/846938622209245184

काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेतेही या संघर्षयात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या मोर्च्याला कम्युनिस्ट, शेकापसह अगदी MIM चे देखील आमदार असतील.

https://twitter.com/congress_nagpur/status/846767083631398912

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. त्यांचं विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. या स्वागतानंतर काँग्रेसचे आमदार एसी बसमधून चंद्रपूरकडे रवाना झाले.

दरम्यान, सर्व पक्षांची एकत्रित ताकद पणाला लावत सरकारला धक्का देणार असल्याचं माजी मंत्री पतंगराव कदम यांनी म्हटलं आहे. संघर्षयात्रेनिमित्त नेत्यांना लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेवरही त्यांनी भाष्य केलं.

निवडणुकीच्या काळात जेवणावळीच्या बडेजावपणाची भरपूर चर्चा झाली, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मिळेल ते खाऊन सरकारविरोधात बंड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, ही आचारसंहिता कुणी तयार केली, यावर मात्र पंतगराव कदमांनी मौनच बाळगलं.