मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या संघर्षयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. चंद्रपुरातील आत्महत्याग्रस्त बंडू करकाडेच्या कुटुंबियांना भेटून संघर्षयात्रेला सुरुवात होणार आहे.


LIVE: विरोधी पक्षाच्या "संघर्ष यात्रे"ला सुरुवात, विरोधी पक्षाचे आमदार नागपूरहून चंद्रपूरकडे रवाना 

काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे तर राष्ट्रवादीचे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेतेही या संघर्षयात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे या मोर्च्याला कम्युनिस्ट, शेकापसह अगदी MIM चे देखील आमदार सहभागी होणार असल्याची बोललं जातं आहे.

दरम्यान, सर्व पक्षांची एकत्रित ताकद पणाला लावत सरकारला धक्का देणार असल्याचं माजी मंत्री पतंगराव कदम यांनी म्हटलं. संघर्षयात्रेनिमित्त नेत्यांना लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेवरही त्यांनी भाष्य केलं.

निवडणुकीच्या काळात जेवणावळीच्या बडेजावपणाची भरपूर चर्चा झाली, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मिळेल ते खाऊन सरकारविरोधात बंड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, ही आचारसंहिता कुणी तयार केली, यावर मात्र पंतगराव कदमांनी मौनच बाळगलं.