मुंबई : महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली. जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष आहे. कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही असा अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. या मंत्र्यांना झोप कशी लागते. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात फक्त एकच धंदा सुरुय तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला


राज्यकर्त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. रोज महिलांवरच्या बलात्कार आणि अत्याचारामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी बाहेरून येऊन आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू शकत नाही. हाथरसच्या घटनेचा निषेध केलाच पाहिजे. मात्र राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरून विरोध म्हणजे बेगडीपणा आहे. राजस्थानमधल्या दलित मुलीबद्दल का नाही केलं आंदोलन, का नाही केलं ट्वीट? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. फेब्रुवारीत सात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा का नाही केले आंदोलन? क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नसतील तर कुठे सुरक्षित असणार? आमच्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी हाथरसला जाऊन संवेदना व्यक्त केली. पण तेच मंत्री त्यांच्या बाजूला हिंगणघाटला का नाही गेले? किती महिलांचा विनयभंग झाल्यावर तुम्ही SOP करणार आहात? मुख्यमंत्री, गृहमंत्री या तुमच्या मुली नाहीत का? आमच्या पत्राला उत्तर देऊ नका पण कृतीतून तरी उत्तर द्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, असं दिसतंय


या सरकारमध्ये समन्वय नाही. कोणी काही बोलतंय, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संताप आहे. केस दाखल केली नाही, म्हणून बेंचसमोर प्रकरण जाऊ शकत नाही आणि स्थगिती उठणार नाही. कधीकधी मला यांच्या मनातच काळंबेरं आहे, असं वाटतं. कारण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही असं दिसतंय. भाजपने केलेला कायदा वैध नसता तर हायकोर्टात मान्य झालाच कसा? यांच्या नाकर्तेपणाचा ठपका भाजपच्या माथी मारण्याचे काम ते करत आहेत.


मराठा आणि ओबीसी समाजाला आमने सामने आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही भाजपची भूमिका आहे. मी स्वतः भोगलं आहे. महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही सामान्य माणूस जळतो. आम्हाला हे उद्रेक नको आहेत. सनदशील मार्गाने आंदोलनं करा. आम्ही हा तिढा सोडवण्यासाठी सरकारसोबत आहोत. विरोधासाठी विरोध करणारा आम्ही विरोधी पक्ष नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा विरोधी पक्ष आहोत.


एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे की नाही यावर मार्ग काढणं हे सरकारचं काम आहे. झुलवत ठेवणं हे सरकारचं काम नाही. इथे कोणी बसायला, चर्चा करायलाच तयार नाही. हे सरकार नेमकं चालवतय कोण हेच कळत नाही. आंदोलनं करत राहा, आम्ही पोलिसांच्या माध्यमातून आंदोलनं चिरडू असा पवित्रा सरकारचा आहे. राज्य सरकारने विधिमंडळाच्या अधिकारांचा वापर करून मार्ग काढायचा असतो.


कृषी विधेयकावरून फडणवीस यांचा शरद पवारांवर निशाणा


शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या त्यांच्या पुस्तकात शेतीमाल कुठेही विकण्यावर बंदी नको. तसेच एपीएमसी मोडीत काढायला हव्या. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे मत व्यक्त केले आहे. तसेच शरद पवारांनी कृषी विधेयकाला कुठेच जाहीर विरोध केलेला नाही. त्यांनी फक्त राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाची निंदा केली. मात्र वरून 'मॅडम'चा आदेश आल्यानंतर विरोध करण्यास भाग पडत आहेत. त्यामुळे उद्धवजींनाही त्यावर विरोध करण्यास भाग पाडले. हे सगळे बेगडी आहेत, अशी टीका त्यांनी केली.


शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी संघर्षाची वेळ आली तरी करू. काल पर्यटन विभागाने नोटीस काढली आणि बारची वेळ वाढवली. मंदिर नाही पण मदिरालयाची वेळ वाढवलीय. मंदिरात कोरोना होतो, मदिरालयात कोरोना होत नाही. उद्धव साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देव, देश आणि धर्माची लढाई आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवली पण तुम्ही बदललात उद्धव जी. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारला वठणीवर आणणए आम्हाला येतं, रस्त्यावर उतरून तुम्हाला वठणीवर आणू, असा इशाला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.


राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला


शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले, पण कोकणाला या सरकारने काय दिलं? विदर्भाला फक्त 16 कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? पिकेल ते विकेल काय करता? मागच्या वर्षी पिकलं ते खरेदी केलं नाही आणि काय वल्गना करता? आम्ही सत्तेत असताना प्रोफेशनल शेतकरी नेते रस्त्यावर उतरत होते ते आता कुठे गायब झालेत?  लबाडी काय असते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसकडून शिकावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.