सांगली : मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेली संवादयात्रा सोमवारी 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार आहे. विधानभवनावर धडक देण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उद्या सकाळी सांगलीहून मुंबईला रवाना होणार आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यभर आंदोलने केल्यानंतर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तरीही त्यांच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी साशंकता कायम आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा आंदोलन केले जाणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या आंदोलने आणि मोर्चांमध्ये अनेक समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावे, पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालास हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, शैक्षणिक शुल्कामध्ये सरसकट सवलत मिळावी, दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, अशा मागण्या सरकारने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे संवाद यात्रेच्या माध्यमातून या मागण्या मांडल्या जाणार आहेत.

उद्या ही संवाद यात्रा मुंबईत दाखल होणार आहे. या यात्रेत 10 हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. आंदोलक उद्या विधानभवनावर धडकतील. संघटनेच्या सर्व मागण्या यावेळी मांडल्या जाणार आहेत.