लातुरात पाणी टंचाईचा बळी, घागर भरुन रस्ता ओलांडताना बसने चिरडले !
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 10 Apr 2017 10:24 AM (IST)
लातूर : लातुरात पाणी टंचाईने एका व्यक्तीचा बळी घेतला आहे. लातूरमधील नवीन वसाहतीत घागर भरुन रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला बसने चिरडले. पिराजी जाधव असे मृत व्यक्तीचं नाव आहे. लातूरमधील बार्शी रस्त्यावरील नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या वॉल्ववरून हजारो लोक रात्रंदिवस पाणी भरतात. पाणी भरताना रस्ता ओलांडत असताना आतापर्यंत इथल्या तिघांचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला आहे. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. लहान मुले, महिला या सगळ्यांची पाण्यासाठी या वॉल्ववर दिवसभर गर्दी असते. लातूर-बार्शी रस्त्यावर वाहने भरधाव वेगात असतात. वाहनाचा वेग आणि खांद्यावरची घागर सांभाळताना आतापर्यंत तिघांना जीव गमवावा लागला. काल (रविवार) सायंकाळी पिराजी जाधव हे देखील पाणी आणण्यासाठी वॉल्ववर गेले होते. रस्ता ओलांडताना भरधाव वेगात असलेल्या पुणे-अहमदपूर बसने त्यांना धडक दिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूनं सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी या भागात पाण्याची व्यवस्था प्रशासन करेल का, हा मात्र कायम आहे.