बीड : राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. बीडमध्ये या उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. केज तालुक्यातील नांदूरघाट येथील रुपाबाई पिसळे (67) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


रुपाबाई पिसळे बीड येथे आल्या असता दुपारी त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. रात्री साडे 9 च्या सुमारास त्या नागरिकांना मृत अवस्थेत आढळल्या.

पोलीसांना घटनेची माहिती समजताच पंचनामा करुन मतदान कार्डच्या आधारावर रुपाबाई यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली.

राज्यात रायगडमध्ये उच्चांकी तापमान

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच आहे. त्यातच गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांमध्ये मंगळवारी भीराचा दुसरा क्रमांक होता. न्यूझीलंडजवळील सामोआ येथे जगातील सर्वाधिक 49.6 अंश सेल्सिअस तापमान होतं.

अकोल्याचा या यादीत 11 वा क्रमांक होता. अकोल्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. राज्याच्या इतर भागातही कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली.

पुणे, जळगाव, मालेगाव, सोलापूर यांच्यासह नाशिक आणि सातारा येथेही कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं.

मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर होतं.

पाण्यावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या भीरा येथे कमाल तापमान नेहमीच जास्त राहतं. मात्र यावेळी अकोल्याला मागे टाकत भीरा येथे सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं.

राज्यात उन्हाने काहिली, मात्र हिट वेव्ह नाही : पुणे वेधशाळा

अजून चैत्र महिना सुरु झाला नसला तरी राज्यात वैशाख वणवा पेटलेला दिसून येतो आहे. मात्र, राज्यातील या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले.

ज्या ठिकाणचं सामान्य तापमान 40 अंश सेल्सिअस असतं, तिथल्या तापमानात साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअसची वाढ झाली, तर त्यालाच तांत्रिकदृष्ट्या हिट वेव्ह म्हणता येतं. त्यामुळे राज्यातल्या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने सांगितले.

आताची परिस्थिती सामान्य आहे. विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात एखाद-दोन ठिकाणी हीट वेव्ह सारखी परिस्थिती आहे. मात्र, तिथेही उद्यानंतर परिस्थिती निवळेल असेही पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, केरळ, तमिळनाडू, ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची चिन्ह आहे. मात्र, महाराष्ट्रात आवश्यक तेवढी आर्द्रता नाही, त्यामुळे ढग तयार झाले तरी पावसाची शक्यता नाही.

राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचं तापमान 40 अंशांच्या वर पोहोचलं आहे. तर उरलेल्या शहरांचं तापमानही 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. सोमवारी अकोल्यात सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली आणि सोलापूरमध्येही पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे.