On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. त्याला 17 जानेवारी हा दिवसही त्याला अपवाद नाही. आजचा दिवस इतिहासातील अनेक महत्वाच्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आजच्याच दिवशी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली होती. सुरक्षा परिषद हा संयुक्त राष्ट्राच्या महत्वाच्या सहा अंगापैकी एक आहे. अमेरिकेचे शास्त्रज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक बेंजामिन फ्रँकलिन यांचा आजच्याच दिवशी जन्म झालाय. त्याशिवाय आजच्याच दिवशी 1956 मध्ये बेळगाव, बिदर आणि कारवार हे मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकला जोडण्याची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 


1946 - सुरक्षा परिषदेची पहिली बैठक (United Nations Security Council) - 


आजच्याच दिवशी 1946 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली होती. सुरक्षा परिषद हा संयुक्त राष्ट्राच्या महत्वाच्या सहा अंगापैकी एक आहे. जगात शांती आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठी संयुक्त परिषदेकडे निर्णय घेण्याचा आणि दंड करण्याचा अधिकार आहे. 
 
1706 -  बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म (Benjamin Franklin) -


अमेरिकेचे शास्त्रज्ञ तसेच प्रसिद्ध लेखक बेंजामिन फ्रँकलिन यांचा आजच्याच दिवशी जन्म झालाय. फ्रँकलिन यांनी  तयार केलेला ‘विद्युतनिवारक (लाइटनिंग कंडक्टर)’ उंच इमारतींचे विजेपासून रक्षण करण्यास आजही उपयोगी पडतो. फ्रँकलिन यांनी फिलाडेल्फिया येथे 1752 मध्ये गडगडाटी वादळात पतंग उडविण्याचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. हा प्रयोगच विद्युतनिवारकाच्या निर्मितीला कारणीभूत ठरला होता. फ्रँकलिनने आकाशातील वीज, तसेच दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर निर्माण होत असलेली घर्षणजन्य वीज- या दोन्ही एकच असल्याचे प्रयोगातून दाखवून दिले होते. बेंजामिन फ्रँकलिन अष्टपैलू व्यक्तीमत्व होतं. फ्रँकलिन एक लेखक आणि मुद्रक, व्यंगचित्रकार, राजकीय सिद्धांतकार, राजकारणी, वैज्ञानिक, शोधक, नागरी कार्यकर्ता, राजकारणी, सैनिक आणि मुत्सद्दी होते.  17 एप्रिल 1790 रोजी बेंजामिन फ्रँकलिन यांचं निधन झालं होतं. 
 
1945 - जावेद अख्तर यांचा जन्म (Javed Akhtar) -


प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी झाला होता. ग्वालियर येथे एका मुस्लिम कुटुंबात जावेद अख्तर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जान निसार खान हे स्वतः चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जावेद अख्तर यांनी बॉलिवूडला अनेक अजरामर गाणी दिली आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने पाच वेळा गौरविण्यात आलेले जावेद अख्तर यांचा आज जन्मदिवस आहे. जावेद अख्तर यांनी दोन विवाह केले आहेत. जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी आहे. 1985 मध्ये पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन जावेद अख्तर यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी हिच्याशी लग्न केले. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा फिल्म इंडस्ट्री मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून आहेत. 


1956 - बेळगाव, कारवार आणि बिदर कर्नाटकमध्ये सामील (maharashtra karnataka border dispute) -


एक नोव्हेंर 1956 रोजी कर्नाटक या नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आलं. त्यावेळी 17 जानेवारी रोजी बेळगाव, बिदर आणि कारवार हे मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकला जोडण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णायामुळे मराठी बांधवामध्ये संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी आंदोलनाचा मार्गही अवलंबला होता. आजही बेळगावसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये वाद सुरु आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यामुळे नुकतेच दोन्ही राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. 


1917 - एम जी रामचंद्रन यांचा जन्म ( M G Ramachandran (MGR)) - 


दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि मुरब्बी राजकीय नेते एम जी रामचंद्रन यांचा आजच 1917 मध्ये जन्म झाला होता. त्यांना एमजीआर या नावाने ओळखलं जातं. त्यांनी दाक्षिणात्या चित्रपट आणि राजकारणात भरिव काम केलेय.  चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला होता. तमिळनाडूचे ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते.  अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना एमजीआर यांनी केली होती.1977 ते 1987 या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची तीन वेळा सूत्रे सांभाळली आहेत. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती.  



1989 - उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय (J K Bajaj)


आजच्याच दिवशी 1889 मध्ये जे. के बजाज उत्तरी ध्रुवावर पोहचले होते. उत्तर ध्रुवावर पोहचणारे ते पहिले भारतीय ठरले होते. ​रॉबर्ट पियरी हा उत्तरी ध्रुवावर पोहचणारा जगातील पहिला व्यक्ती होय. तो 6 एप्रिल 1909 मध्ये उत्तरी ध्रुवावर पोहचला होता. 


आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना -
1601 -  मुघल सम्राट अकबरने असीरगढ येथील किल्यात प्रवेश केला.
1917 : दाक्षिणात्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते एम जी रामचंद्र यांचा जन्म
1941 : सुभाष चंद्र बोस कोलकात्यावरुन जर्मनीसाठी रवाना झाले. 
1945: दुसरे महायुद्धात रशियन सैन्यांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
1951 : प्रसिद्ध साहित्यकार ज्योत प्रसाद अग्रवाल यांचं निधन
1987 : टाटा फुटबॉल अकादमीला सुरुवात
2007 - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मायकल बेवन यानं निवृत्तीची घोषणा केली. 
2010 : भारताचे प्रसिद्ध मार्क्सवादी नेते ज्योती बसु यांचं निधन
2014 - सुनंदा पुष्कर यांचं निधन
2015: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री चित्रा सेन यांचं निधन