उस्मानाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या जागा बळकावण्यासाठी परराज्यातल्या विद्यार्थ्यांनी बनावट डोमिसाईल सर्टिफिकेट बनवलेत. एक दोन नव्हे तर तब्बल 400 बनावट डोमिसाईल सर्टिफिकेटचा पर्दाफाश झाल्यामुळं पालकांची आणि विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.


महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशांची पहिली यादी 25 जुलैला प्रसिध्द होणार आहे. त्या आधीच सजग पालकांनी माहिती संकलित करुन एकाच विद्यार्थ्याच्या नावावर दोन दोन डोमिसाईल असल्याचा पुरावा एबीपी माझाला दिला. परराज्यातल्या 400 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा 15 वर्षांपासून आधिवास असल्याचं बोगसं प्रमाणपत्रं मिळवलं आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता यावी यासाठी देश पातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली. मात्र, या प्रक्रियेतही पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी घोटाळा केल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 85 टक्के कोट्यात वर्णी लावण्यासाठी दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गोवा, गुजरात अशा परराज्यांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ राज्याबरोबर महाराष्ट्रातूनही खोटा अधिवास दाखला देऊन अर्ज भरले.



वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या यादीवरूनच हे स्पष्ट झालं. महाराष्ट्र राज्याच्या यादीतून जवळपास 400 विद्यार्थ्यांची नावं काढून टाकण्यात आली आहेत. ज्या जागा परराज्यातील विद्यार्थ्यांना देण्याचा डाव आहे.

महाराष्ट्रातही आधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठी रांगा लागल्या होत्या. शेकडो मुंल तासंतास रांगेत उभी होती. यांच्याकडे गाव तलाठ्याने, पालिकांनी दिलेली आधिकृत रहिवासी प्रमाणपत्र होती. या मुलांबरोबरच बाहेरच्या राज्यातल्या 400 मुलांना महसूलच्या मंडळींनी किती पैसे खाऊन बोगस प्रमाणपत्र दिली हा गहन प्रश्न आहे.

महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांत 3 हजार 500, शासकीय अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे दीड हजार जागा अशा एकूण पाच हजार जागा आहेत. विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवासी आहे, त्या राज्यातील 85 टक्के कोट्यात तो अर्ज भरू शकतो. त्याचबरोबर अन्य राज्यात प्रवेश घ्यायचा असल्यास 15 टक्के ऑल इंडिया कोट्यात अर्ज भरता येतो. याचा फायदा महाराष्ट्रातल्याच मुलांना होईल, यासाठी डोळ्यात तेल घालून पाहण्याची गरज आहे.