मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.


संजय राऊत म्हणाले की, राजकीय परिस्थिती अस्थिर असली की आमदार फोडण्याचं राजकारण केलं जातं. ज्याच्या हाती सत्ता आहे, ताकद आहे, पैसा आणि यंत्रणा आहे ते लोक असा प्रयत्न करतात. कोणतंही राज्य त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा अथवा झारखंडमध्ये असे प्रयत्न झाले आहेत. परंतु राज्यातल्या जनतेने त्यांची चिंता करु नये. कारण शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकण्याचीसुद्ध कोणी हिंमत करणार नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील एकही आमदार फुटणार नाही.

राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांमधील फोडाफोडीचं राजकारण करणारे लवकरच समोर येतील. अशा प्रकारचं राजकारण अनेक ठिकाणी केलं गेलं आहे. राज्यातही प्रयत्न सुरु आहे, हे आपल्या राजकारणाचं दुर्भाग्य आहे. परंतु महाराष्ट्रात यावेळी कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही.

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. राज्यातल्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. भाजपला सर्वाधिक (105) जागा मिळाल्या असल्या तरी सत्तास्थापन करण्यासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही गोड बातमी मुनगंटीवार देतील, संजय राऊतांचा टोला