नवरात्रोत्सवाचा ज्वर शिगेला पोहचलेला असतानाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवा आदेश काढला आहे. या काळात स्त्री आणि पुरुष भाविकांनी पूर्ण पोषाखातच मंदिरात यावं, असा आदेश काढण्यात आला आहे. आता देवस्थान समिती थेट महिलांच्या कपड्यांवर घसरल्यानं महिलांमध्ये संतापाची लाट उसळली.
इतकंच काय, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर आंदोलनाचाच इशारा दिला. चहूबाजूने कोंडी झाल्यानंतर अध्यक्षांना उपरती झाली आणि हा आदेश नसून विनंती असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं.
मुळात तोकड्या कपड्यांची व्याख्या काय? कुणी कसे कपडे घालावे हे कोण ठरवणार? शिवाय मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून मुद्दाम कोण येईल? त्यामुळे प्रशासनाने असले फतवे काढू नयेत आणि भाविकांनीही मंदिराचं सौहार्द टिकवावं, इतकीच अपेक्षा आहे.