पुणे : साखर कारखान्याचाच अनुभव माझ्यापेक्षा शरद पवार साहेबांना जास्त आहे. मी पण त्यात प्रयत्न केला आहे. पण मी सांगतो काहीही करा पण यापुढे साखर कारखानदारी नको, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. साखरेऐवजी इथेनॉलच उत्पादन घेता येईल का याचा विचार करणं जास्त गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले.


पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  राष्ट्रवादी नेते शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत साखर परिषदेत ते बोलत होते.

साखर उद्योग वाढवायचा असेल तर इथेनॉल तयार केले तर साखर उद्योग वाढू शकतो. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉल खरेदी करू शकतो. साखर तयार केली तर विक्री होऊ शकत नाही. यामुळे पैसे फुकट जातात. जागतिक बाजारपेठेत आपल्या साखरेला मागणी कमी आहे. केंद्र राज्य मिळून सबसिडी देऊन साखर निर्यात केली जात आहे, असे गडकरींनी सांगितले.

मी तीन कारखाने चालवण्याचं धाडस केलं, मात्र ते किती कठीण आहे ते आता कळालं आहे. मला कुणी विचारलं तर आता कारखानदारी करू नका असाच सल्ला देतो, असेही गडकरी म्हणाले.

साखरेऐवजी इथेनॉलचं उत्पादन घेता येईल का याचा विचार करणं आता जास्त गरजेचं आहे, असे गडकरी म्हणाले.  उसाच्या रसापासून आता साखर तयार करायची का इथेनॉल याचा विचार करण्याची गरज आहे. हा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर साखरेऐवजी इथेनॉलवर भर देण्याची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.

इथेनॉलचे उत्पन्न वाढवणे या व्यवसायासाठी हिताचे आहे. साखर का इथेनॉल हे ठरवण्याची गरज आहे, अन्यथा साखर कारखानदारी अडचणीत येईल.  साखर कारखानदारी जर अडचणीत आली किंवा बुडाली तर सरकार पण काही करू शकणार नाही, असेही गडकरी म्हणाले.