“महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले. मात्र त्या बैठकीच्या कागदांवर मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अन्य शासकीय सदस्यांच्या स्वाक्षऱ्याच नाहीत. कागदपत्रांवर फक्त अशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे कागदपत्रांवर मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांच्या सह्या नसतानाही पुरस्कार जाहीर कसा करण्यात आला”, असे म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी या प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधले.
“बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार जाहीर करण्यासाठी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या नावाने शासन आदेश काढण्यात आला आहे. त्यातही एकाच अधिकाऱ्याची सही असून दुसऱ्या अधिकाऱ्याने सहीच केलेली नाही. त्यामुळे पुरस्काराच्या शासकीय घोळावरून नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. हा पुरस्कार बोगस आहे आणि ही घटना अतिशय गंभीर असून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी सभागृहाचे कामकाज स्थगित करून चर्चा करण्यात यावी”, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.