पुणे : पीएफआय (PFI) या बंदी घातलेल्या संघटनेच्या चौदा ठिकाणांवर एनआयएने (NIA) छापे टाकून कारवाई सुरु केली आहे. देशातील पाच राज्यात पसरलेल्या या कारवाईत महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि नाशिकमधील पीएफआयच्या स्लीपर सेलचा समावेश आहे. देशविरोधी कारवायांसाठी बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयचे स्लीपर सेल अजूनही वेगवगेळ्या ठिकाणी काम करत असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. 


पीएफआय पुन्हा एकदा रडारवर आहे. केरळमधील कन्नूर आणि मणप्पुरम, दक्षिण कर्नाटक, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद, बिहारमधील मोतीहारी आणि महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी एनआयएने एकाचवेळी छापेमारी करून पीएफआयच्या अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. समाजात सामान्य नागरिक म्हणून वावरणारे हे पीएफआयचे पाठीराखे प्रत्यक्षात देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा एनआयएचा आरोप आहे. या आधी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एनआयएने देशातील अकरा राज्यांमध्ये छापेमारी करून 109 पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेळ्या शहरांमधून 20 आरोपींना अटक करण्यात आली होती. 


पीएफआयने एक राजकीय आणि सामाजिक संघटन म्हणून स्वतःला सादर करण्याचा प्रयत्न केलाय. या संघटनेचे कार्यकर्ते वरकरणी इतर सामान्य नागरिकांसारखी कामे करत असल्याचं भासवतात. पुण्यात ज्यांना अटक करण्यात आली ते अब्दुल कय्युम शेख आणि रझी अहमद खान हे दोघे बांधकाम क्षेत्रात काम करत होते. यातील रझी अहमद खान हा तर कोंढवा पोलीस स्टेशनच्या समोरच राहत होता. त्यामुळं कोणाला संशय येण्याचा धोकाही नव्हता. 


मात्र एनआयने टाकलेल्या छाप्यात पीएफआयकडून मुस्लिम तरुणांना कट्टरतावादाचं प्रशिक्षण तर देण्यात येत होतं. त्याचबरोबर शस्त्र आणि विस्फोटकं तयार करण्याचं आणि वापरण्याचं प्रशिक्षणही दिलं जात होतं असा एनआयएचा दावा आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ब्लु बेल स्कुलच्यावरती असलेल्या सहाव्या मजल्यावरील टेरेसवर पीएफआयकडून ट्रेनिंग कॅम्प चालवला जात होता. एनआयएने इथून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पीएफआयच्या विचारसरणीचा प्रचार करणार साहित्यही जप्त केलं आहे. 


पीएफआय ही संघटना वादात सापडण्याला या संघटनेच्या  केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या हिंसक संघर्षाची पार्श्ववभूमी आहे. केरळमधील नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट आणि कर्नाटकमधील कर्नाटका फोरम फॉर डिग्निटी या दोन संघटना एकत्र येऊन 2006 साली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापन करण्यात आली. सुरुवातीला दाक्षिणात्य राज्यांमध्ये विस्तार झाल्यानंतर पुढे देशातील इतर राज्यातही पीएफआय वेगाने पसरली. कोणी या संघटनेला सीमा बंदी घातलेल्या संघटनेचा नवीन अवतारही म्हटलं. 


पीएफआयने यायाधी केरळमध्ये अनेक हत्या घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांच्या अहवालांमध्ये या संघटनेला धोकादायक ठरवण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर दाक्षिणात्य राज्यातील या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इतर राज्यांमध्ये आश्रय घेतला. एनआयएच्या कारवाईतून देशभर पसरलेले पीएफआयचे जाळे उद्धवस्त केले जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


ABP Majha Zero Hour Show : मत तुमचं व्यासपीठ 'माझा'चं, आता चर्चा फक्त जनहिताचीच; एबीपी माझाचा 'झीरो अवर' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला