Nawab malik vs Narayan Rane : महाविकास आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळेल, या नारायण राणे यांच्या दाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या शेब्दात टीका केली आहे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय, असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी नारायण राणे यांची फिरकी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल असा दावा केला होता. याबाबत मलिकांनी नाव न घेता ट्वीट करत निशाणा साधालाय.


शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलातना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले त्यानंतर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे. 23 वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतंय, अशी टीका मलिकांनी केली.


आमचे आघाडी सरकार खंबीर असून ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे आमचे सरकार 25 वर्षापर्यंत टिकेल असे जाहीर केले होते. याची आठवणही यावेळी नवाब मलिक यांनी करून दिली. भाजपचे जुने नेते आता थकले आहेत आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही. भाजपचा राष्ट्रवाद मनुवादी भूमिका जाहीर करणारा आहे. तो आम्ही कधीच मान्य करणार नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकतांत्रिक व्यवस्था निर्माण करणारा देश राहील हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रवाद आहे, असेही मलिक यांनी म्हटले.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha