मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत टोलेबाजी केली आहे. मलिक यांनी म्हटलं की, शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाने शरद पवार पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट शरद पवार देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतील. याचा फायदा विरोधक एकत्र येतील आणि मोदी सत्तेतून बाहेर जातील. देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचं आहे की, ते शाळेत होते तेव्हा 1984 साली लोकसभा निवडणुकीत भाजपची संख्या 2 वर गेली होती. त्यावेळी तुमचे खासदार सायकलवर बसून संसदेत जात होते हे तुम्ही विसरलात का? असं नवाब मलिक म्हणाले.


नवाब मलिक म्हणाले की, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ज्या वेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली तेव्हा चमत्कार घडला असल्याचं उदाहरण आहे. विधानसभेपूर्वी ते म्हणायचे की पवार यांचं राजकारण संपलं आहे परंतु त्यावेळी चमत्कार घडला होता आता देखील लोकसभेला चमत्कार पाहिला मिळेल, असं देखील नवाब मलिक म्हणाले.


संजय राऊतांवर गुन्हा दाखल केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की,  जे भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यांच्याविरोधात भाजप कायम सत्तेचा दुरुपयोग करत आला आहे. कायदेशीर कारवाईला नक्कीच संजय राऊत सामोरे जातील, असं ते म्हणाले. 


 उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रवादी सपासोबत जाणार?


उत्तरप्रदेशमधील निवडणुकांच्या संदर्भात बोलताना मलिक म्हणाले की, उत्तरप्रदेश मध्ये मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही सपासोबत जाण्याबाबत बोलणी सुरू आहे. जे ताकदीने उत्तरप्रदेश मध्ये लढत आहेत. त्यांच्याबरोबर लढण्याची भूमिका आमची उत्तर प्रदेश बाबत आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या गुंडूराव यांच्यासोबत प्रफुल पटेल यांचं बोलणं झालेलं आहे. परंतु अजूनही आम्हांला प्रतिसाद मिळालेला नाही. निश्चितपणे सर्व एकजूट झाले पाहिजेत. याबाबत काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर आमची भूमिका ठरेल, असं मलिक म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या