परभणी : परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप यश आलेलं नाही. त्यातच यंदा ही जागा कुठल्याही परिस्थतीत जिंकायची असा आदेश पक्षाकडून आहेत. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी अनोखी शक्कल लढवली आहे.


बाबाजानी दुर्राणी यांनी वृत्तपत्रात नववर्षाच्या जाहिरात जनतेला खासदार बदलण्याचे आवाहन केलं आहे. 'खासदार बदला, जिल्हा बदलेल... वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची' या मथळ्याखाली ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शिवसेनेने आजपर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केल्याचा आरोप त्यांनी या जाहिरातीमधून केला आहे.


सतत शिवसेनेचा खासदार निवडून दिल्याने जिल्ह्याची अवस्था बकाल झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीचा विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला हरवून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आणल्याशिवाय परभणीचा विकास शक्य नाही, असं जाहिरातीत म्हटलं आहे.

यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण ही जाहिरात परभणीकरांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.