उस्मानाबाद : राज्यात सरकार भाजपचं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर पेरणीला कुठेही आडकाठी आलेली नाही. राज्यातले सहकारी साखर कारखाने विक्री न करता भाडेतत्वावर द्यायचा निर्णय झाला. त्या निर्णयाचा राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा होताना दिसतोय.


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमचा बाणगंगा सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी चालवायला घेतला. परळीच्या वैद्यनाथ बँकेने केलेल्या लिलावात राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सहकाऱ्यांनी दिलीप आपेट यांचा खाजगी कारखाना तब्बल 55 कोटी रुपयांना विकत घेतला.

त्याआधीच काही दिवस राणा पाटील यांना किल्लारीच्या सहकारी साखर कारखान्यावर कब्जा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात सरकार भाजपचं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर पेरणीत कुठेही आडकाठी आलेली नाही असं एकंदरीत चित्र आहे.

काही दिवसांपूर्वीच दिलीप आपेट यांच्या मालकीच्या शंभूमहादेव या खाजगी साखर कारखान्याचा लिलाव पार पडला. या लिलावात उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह आणि मुरुडचे दिलीप नाडे यांनी हा कारखाना 55 कोटी रुपयांना खरेदी केला.

राणा जगजित सिंह यांच्याकडे हा दुसरा कारखाना झाला आहे. या आधी किल्लारीच्या कारखान्यावरही राणा जगजीत सिंह यांनी बोली लावली होती.