सांगली : केंद्र सरकारने खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. एकीकडे पेट्रोलच्या किंमती शंभरच्या वर गेल्या असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच  कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन हाती घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले. या दरवाढीचा देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उचलतील, अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.


भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढवण्याचे काम भारत सरकारने केले आहे. 10.26.26 ची किंमती 600 रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी 1185 रुपयाला होता, तो आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 चे पन्नास किलोचे पोते 1175 रुपयांचे होते तेच आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमतीही वाढवल्या आहेत. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक मोठे संकट निर्माण झालं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.