सांगली : सांगलीतील एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप सोपल यांनी मिश्कील शब्दात आघाडी सरकारचे वाभाडे काढले. मंत्रिपदावरुनही राष्ट्रवादी काँग्रेसला दिलीप सोपल यांनी घरचा आहेर दिला.


 

“मी पक्षात सर्वात ज्येष्ठ असतानाही मागून येणाऱ्या मुलांना मंत्रिपद देण्यात आली. पण मला जेव्हा मंत्रिपद देण्यात आलं, तेव्हा राज्यात दुष्काळ पडलेला होता. थोडक्यात काय तर, मुसलमान व्हायला आणि रोजा महिना यायला अशी माझी गत झाली होती”, असे म्हणत माजी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी शिराळ्यात राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

 

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना अजित पवार यांनी धरणातल्या पाण्याबाबत केलेलं विधान त्यांना चांगलचं भोवलं. त्यामुळे नंतर त्यांच्यावर आत्मक्लेष करण्याचीही वेळ आली. आज राज्यात सत्तांतर झालं आहे, तेव्हाचे कारभारी आज विरोधी बाकांवर आहेत. दुष्काळ स्थितीबाबत युती सरकार सपशेल अपयशी ठरत असल्याचाही आरोप आघाडीकडून होतो आहे. मात्र, राज्याची सत्ता हाती असताना आघाडी सरकार पाणी, जलसंधारण, दुष्काळी मदत याबाबत खरोखर गंभीर होतं का? लोकहिताच्या योजना खरोखर प्रामाणिकपणे राबवल्या गेल्या का? असा प्रश्न दिलीप सोपल यांच्या भाषणानंतर सामन्यांना पडू शकतो.

 

आघाडी सरकारच्या काळातील अनेक अनुत्तरित प्रश्नांना तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांनी अप्रत्यक्ष उत्तरं दिली. त्यांचा बोलण्याचा लहेजा अर्थात मिश्कील होता. त्यामुळे मोठा हशाही पिकला. मात्र, योजनांचा कारभार अशा पद्धतीनं चालत असेल. तर खरोखर ही गंभीर गोष्ट आहे.

 

ऐका… सोपल काय म्हणतायत? पाहा व्हिडीओ: