मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मध्यावधी निवडणुकांनी राज्याचं फार नुकसान होणार नाही, असा ट्विटर बॉम्ब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टाकला आहे.


https://twitter.com/PawarSpeaks/status/831188290501947392

शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. कारण कालच झालेल्या ठाण्यातील सभेत पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेला डिवचलं होतं.

https://twitter.com/PawarSpeaks/status/831188051086893056

दरम्यान युती सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकीतही पवारांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. महापालिका निवडणुकांनंतर काही तरी मोठी राजकीय घटना घडेल, असंही पवार म्हणाले होते.

मुंबईत झालेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीका केली होती. मात्र पवारांनी ठाण्यात झालेल्या सभेतून दोघांवरही शरसंधान साधलं.

भाजपकडून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पण महापालिकेत शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे. शिवाय शिवसेनेचे नेते गुंडगिरी करतात, असा भाजपचा आरोप आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे ही जबाबदारी कुणाची, असा सवाल करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे हे अगदी मोदींपासून राज्यातील भाजपवाले कसे आहेत हे सांगतात आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात. शिवसेनेला सत्तेची ऊब बाहेर पडू देत नाही, असा टोलाही शरद पवारांनी शिवसेनेला लगावला.