मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपासाठी अखेरीस चर्चेला सुरुवात झाली आहे. आज या चर्चेची पहिली फेरी पार पडली. पण पहिल्या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या भूमिका मांडल्याचे समोर आले आहे.


नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब राहिली. काँग्रेसचा फक्त एक खासदार निवडून आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांना हार पत्करावी लागली. तर राष्ट्रवादीला पाच जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी काँग्रेसकडे 50: 50 जागांची मागणी केली आहे.

वर्ष 2009 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून निवडणूक लढले होते. तेव्हा काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. पण लोकसभा निवडणुकीत वाढलेली ताकत पाहता आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 50:50 जागांची मागणी केली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार जागा वाटपाचे सूत्र असावे असा प्रस्ताव मांडला आहे. म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्या अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

यानुसार काँग्रेसने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या 42 आणि काँग्रेस उमेदवार दोन क्रमांकावर असलेल्या 64 अशा 106 जागा थेट काँग्रेसला मिळव्या अशी मागणी  केली आहे. तर राष्ट्रवादीने 2014 ला जिंकलेल्या 41 आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दोन क्रमांकावर असलेल्या 54 जागा अशा 95 जागा राष्ट्रवादीने घ्याव्या, असा प्रस्ताव काँग्रेसने मांडला. 288 पैकी उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर काँग्रेस - राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांमध्ये चर्चा व्हावी अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसपेक्षा आपला पक्ष चांगल्या स्थितीत असल्याचा विश्वास राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे यावेळी नेमकी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो हे पाहणे महत्वाचे आहे.

लवकरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांची बैठक देखील होणार आहे. त्यांना किती जागा देणार? मनसे आघाडीत येणार का? वंचित बहुजन आघाडीचे काय? याबाबत ही अद्याप चित्र स्पष्ट व्हायचे आहे.