मुंबई : शिवसेनेची तयारी असेल तर आम्ही पर्यायी सरकार देऊ शकतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक एबीपी माझाशी बोलत होते.


राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुढे आलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत नवाब मलिक यांच्याकडे विचारणा केली असता, मलिक म्हणाले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येणार नाही. शिवसेनेची तयारी असल्यास आणि त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितल्यास आम्हीदेखील हात पुढे करु. त्यामुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल.

शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू
जयंत पाटील भाजपने शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारांना पराभूत करतील. तसंच भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले तर आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून चर्चेची दारं बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉचच्या' भूमिकेत असल्याचं समजतं. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असं कळतं. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल.

व्हिडीओ पाहा