मुंबई : राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षांमधील मतभेद उघड झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राष्ट्रवादीची अनुपस्थिती दिसून आली.


अधिवेशनापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदाही दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या होणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील वेगळी पत्रकार परिषद घेतील. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही वेगळी पत्रकार परिषद घेणार आहेत.

कर्जमाफीसारखे अनेक प्रश्न या अधिवेशनात विरोधकांच्या हातात आहेत. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांमध्ये फूट पडली आहे. विरोधी पक्षांनी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. मात्र राष्ट्रवादीने आपली पत्रकार परिषद 4 वाजता होणार असल्याचं घोषित केलं.

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होणार आहे. तर तिकडे आज संध्याकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यापूर्वी विरोधकांमधील फूट समोर आली आहे.