Nawab Malik Press Conference : राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्यास भाजपचे मंत्री जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे. 


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना सांगितलं की, "मागील काही दिवसांपूर्वी ईडीने वक्फ बोर्डाच्या ऑफिसवर छापा टाकण्यात आला असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या, मात्र आम्ही स्पष्ट केलं होतं की, असं काही नव्हतं. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही 11 एफआयआर दाखल केल्या आहेत. यातील पहिली एफआयआर नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि दोन्ह गुन्हे आष्टी बीड येथे दाखल केलेले आहेत. या सोबतच काही खाजगी लोकांनी मशिदीच्या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे. ते टाकळी बीड येथील रहिवाशी आहेत."


"बीडमध्ये 3 ठिकाणी सर्व्हिस इनाम जमीन होती. ती मदत इनाम जाहीर करून त्यावर खाजगी नाव चढवण्यात आलं आणि प्लॉटींग करण्यात आलं, तसेच त्याची विक्री केली जात आहे. यासोबतच राम खाडे यांनी 10 ठिकाणी देवस्थानच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार समोर आणले आहेत. यातील 7 हिंदू देवस्थान आहेत आणि 3 मुस्लिम देवस्थान आहेत.", असं नवाब मलिक म्हणाले. तसेच, यामध्ये विठोबा देवस्थान 31 एकर 42 गुंठे, खंडोबा देवस्थान 35 एकर, राम देवस्थान 65 एकर, खंडोबा देवस्थान बेळगाव 65 एकर अशा अनेक ठिकाणांचा समावेश होत असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं. 


"एकूण 513 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी शेळके यांची मदत घेण्यात आली होती. त्यांना या प्रकरणी निलंबितही करण्यात आलं होतं." 


"या प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे आणि तपास सुरु आहे. या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये ईडीकडे देखील तक्रार देण्यात आली आहे. यामध्ये मच्छिंद्र मल्टीस्टेटचा देखील समावेश आहे. यामध्ये भाजपचे सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावानं देखील ईडीकडे तक्रार करण्यात आली होती.", अशी माहितीही नवाब मलिकांनी दिली आहे. 


"भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. देवस्थानची जागा हडप करणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ज्या तक्रारी उपलब्ध होत आहेत. त्यांची चौकशी करून तथ्य असल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलं असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं.