मद्यकारखान्यांना पाण्याबाबतचं पंकजांचं वक्तव्य स्वार्थातून?
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2016 02:41 AM (IST)
मुंबई : 'पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरीचे संचालक आहेत. शेंद्रा एमआयडीसीत रॅडिको डिस्टिलरी आहे. या कारखान्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो', असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पंकजा मुंडे याही संचालक होत्या. आता त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दारु कारखान्यांचं पाणी तोडू नका या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला वैयक्तिक स्वार्थाची किनार असल्याचं चित्र आहे. 'लोकांना प्यायला पाणी नसताना स्वतःच्या बिअर कारखान्यासाठी पाणी वापरुन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ लावणाऱ्यांनो जनता तुम्हाला माफ करणार नाही' असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मात्र या मुद्यावरुन टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे रविवारी माध्यमांवरच भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्त्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.