मुंबई : आज घटस्थापना, याच निमित्तानं देशभरातील देवीची मंदिरं सजली आहेत. इकडेही तुळजापूर नगरीही सजली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर हळद- कुंकवाची दुकानंही सजली आहेत.


यंदा भाविकांच्या सोयीसाठी प्रथमच तुळजापुरात अत्यंत सवलतीच्या दरात ई-रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे यंदा मंदिरात प्रथमचं बायोमॅट्रीक पद्धतीनं भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी कार्डही बनवण्यात आले आहेत. कार्डवर भाविकांचा फोटो आणि इतर माहिती असणार आहे.

तर मुंबईची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबादेवीसुद्धा आज घटस्थापनेनिमित्त नटली आहे. मुंबादेवीचं मंदिर पूर्णपणे देवीच्या स्वागतासाठी विशेष सजवण्यात आलं आहे. आजपासून पुढचे 9 दिवस मुंबादेवीच्या चरणी मोठी गर्दी होऊ शकते.

तर कोल्हापूरच्या करवीर निवासिनीचं मंदिर रोषणाईनं सजलं आहे. मात्र, यंदा अंबाबाई आणि महालक्ष्मी वादामुळे 20 वर्षांपासूनची परंपरा पहिल्यांदाच मोडणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला तिरूपती बालाजी देवस्थानाकडून नवरात्रात शालू पाठवण्यात येतो.

मात्र, कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरूपतीहून शालू येणार नाही.

नवरात्रौत्सवासाठी यंदा भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून पालखी तयार करण्यात आली आहे. तसंच देवीच्या पूजेवरून पुन्हा कोणताही वाद होऊ नये यासाठी देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येते आहे.