बर्ड्याची वाडीतील जलवाहिनी दुरुस्त, टाक्यांचं वाटप; विहिरीतून पाणी काढण्याची जीवघेणी कसरत टळली
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2019 01:36 PM (IST)
बर्ड्याची वाडी गावातील महिलांना थेंबभर पाण्यासाठी 60 ते 70 फूट खोल विहिरीत उतरुन पाणी भरावं लागत असल्याचं वृत्त एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी प्रसारित केलं होते.
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्ड्याची वाडी गावातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव एबीपी माझाने जगासमोर मांडल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. साडेतीन वर्षापासून बंद असलेली जलवाहिनी अखेर दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावातील पाणी पुरवठा योजना सुरुळीत करण्यात आली. परिणामी महिलांना घराजवळच पाणी मिळू लागलं आहे. गावातील टँकरच्या फेऱ्या वाढल्या असून दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. कोणी टँकरचे पाणी देतंय तर कोणी महिलांना विहिरीत उतरण्याची गरज पडू नये म्हणून पाण्याच्या टाक्या भेट देत आहेत. महिलांना घराजवळ नळातून पाणी मिळू लागलंय. टँकरचं पाणी विहिरीत किंवा पाण्याच्या टाक्यांमध्ये टाकले जात असून त्यातून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. बर्ड्याची वाडी गावातील महिलांना थेंबभर पाण्यासाठी 60 ते 70 फूट खोल विहिरीत उतरुन पाणी भरावं लागत असल्याचं वृत्त एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी प्रसारित केलं होते. पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा संघर्ष बघून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या वृत्तानंतर इथे सकारात्मक बदल घडू लागले आहेत. VIDEO | हंडाभर पाण्यासाठी बर्ड्याची वाडी गावातील महिलांची फरपट | नाशिक | स्पेशल रिपोर्ट