औरंगाबाद : अहमदनगर आणि नाशिकच्या धरणातून समन्यायी पाणी वाटप नियमाप्रमाणे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत आज औरंगाबादच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणी कधी सोडायचं याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय.


जायकवाडी धरणाची सद्यस्थिती पाहता जायकवाडी धरणात 172 दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात जवळपास सात टीएमसी पाणी सोडण्यात येईल. या निर्णयामुळे मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक असा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, या बैठकीपूर्वीच नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे.

कोणत्या नियमाने मिळणार जायकवाडी धरणात पाणी?

राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरिता जलसंपत्तीचे कुशल, समन्यायी आणि टिकाऊ व्यवस्थापन वाटप आणि वापर करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 पारित करण्यात आला. राज्यातील भूपृष्ठावरील, भूगर्भातील पाणी वापराचं नियमन करणे, जलसंपत्तीचे कायदेशीर, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थान वाटप करणे, पाणी वापरासाठी दर निश्चित करणे आणि पाणी वापराचे हक्क प्रदान करणे यासाठी हा कायदा आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण यांच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप हा कायदा करण्यात आलाय. त्यानुसार प्रत्येक धरणात पावसाळा संपल्यावर किती पाणीसाठा असावा याचा निर्णय घेण्यात येतो.

2011-12 ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी पहिल्यांदा समन्यायी पाणी वाटप प्रश्न ऐरणीवर आला आणि वाद सुरू झाला. मराठवाडा जनता विकास परिषदेने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी कोर्टाच्या आदेशाने पाणी सोडण्यात आलं. यावर्षी पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण वरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा आजचा पाणीसाठा

गंगापूर  88.67 %

दारणा   92.97%

मुकणे  73.09%

भंडारदरा  93.16 %

निळवंडे  85.59 %

मुळा 66.62%

करंजवन 93.89%

जायकवाडी धरण आज 36.62% टक्के पाणीसाठा आहे.