नाशिक : सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दैंनदिन रुग्णसंखेचा आलेख उतरणीला लागला असला तरी मृतांचा आकडा अधिक आहे. अशातच सध्या कोरोनामुळे सुरु असलेल्या मृत्यूतांडवात रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स हताश झाले आहेत. कारण नाशकातील 172 रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा, अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असा हताश सूर या डॉक्टरांनी लावला आहे. 


नाशिक मधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावं, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अशातच राज्य सरकार यावर काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, गेल्या एक ते दीड वर्षांपासून आम्ही राज्य सरकारनं दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी करणं आणि कोरोनाची लागण झालेल्या अनेकांचे प्राण वाचवण्यात आम्ही योगदान दिलं आहे. परंतु, आम्ही सर्वजण आता हताश झालो आहोत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले आहोत. त्यामुळे या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा. आम्ही आता आमचे जे कोविड केअर सेंटर आहेत, ते बंद करत आहोत."


एबीपी माझानं या पत्रासंदर्भातील आरोग्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांच्यापर्यंत हे पत्रच पोहोचलं नव्हतं. पण तरिही आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टर्स असं काहीही करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला होता. अशातच खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी लिहिलेल्या पत्रामागील कारण त्यांनी नमूद केलेलंच आहे की, गेल्या काही दिवसांपासून नाशकातील अनेक रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे यातून निराश होऊन हे पत्र लिहिलेलं आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या जितेंद्र भावेंनी नाशिकच्या एका रुग्णालयात आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयाकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी बिलांसंदर्भात आंदोलन केलं जात आहे. रुग्णालयांकडून आकारण्यात येणारी अवाजवी बिलं, किंवा रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार यासंदर्भात नाशकात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी लिहिलेल्या पत्रावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :