Nari Shakti Puraskar : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांना सोमवारी ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. 2020 आणि 2021 या वर्षासाठीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील तीन महिलांमध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, वनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020 साठी तर वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका  कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे.


कोरोना महामारीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नव्हते.  8 मार्च रोजी वर्ष 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार, (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.


पुरस्कर विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन -
राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार' विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांसह अनेक कर्तबगार स्त्रियांनी हा महाराष्ट्र घडवला आहे. हा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींना असे पुरस्कार पुन्हा-पुन्हा मिळणे, त्यांची कर्तबगारी सिद्ध होणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.