या देशात काय बोलायचं. काय दाखवायचं. काय लिहायचं. काय खायचं यावर बंधनं घातली जात आहेत. दोन कोटी लोकांना नोकर्या देतो म्हटले परंतु दोन कोटी नोकर्या मिळण्याऐवजी त्या नोकर्याच गेल्या आहेत असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले.
100 कोटींचे महाराष्ट्र सदन आणि 850 कोटी मला दिले असा आरोप माझ्यावर करण्यात आला. एवढं सुंदर महाराष्ट्र सदन बांधले, त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य शासनाने दिली नाही. जास्त बोलणार्याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि मी जास्त बोललो तर मला टाकले जेलमध्ये. आणि आता जास्त कोण बोलले तर तुमचा भुजबळ करु अशा धमक्या सरकार देत आहे. यांनी माझं सगळं जप्त केलं परंतु जनतेचे प्रेम जप्त करु शकत नाहीत, असेही ते म्हणाले. सत्तेचा माज कशाला अनेक सिंकदर येवून गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत हे लक्षात ठेवा, असा टोलाही आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.
हे सरकार आहे की भिताड आहे : अजित पवार
शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली. आधी राममंदिर बांधणार मग सरकार असे उध्दव ठाकरे सांगत आहेत. अरे चार वर्षे झोपला होतात का? असा सवाल करतानाच अरे उध्दवा अजब तुझे सरकार असा टोलाही पवार यांनी लगावला. महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे परंतु त्यांच्या फोटोला गोळ्या झाडताना आणि तो पुतळा जाळतानाची क्लीप सगळीकडे फिरत आहे. देशात एका महात्म्याचा अपमान केला जातोय आणि मारेकरी नथुराम गोडसेला महात्मा अशी पदवी देवून घोषणा देत आहेत, हे देशात काय चाललयं? असा सवालही पवार यांनी केला.