चंद्रपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची नारायण राणेंची मागणी उद्वेगापोटी आहे. मुंबई संकटात असल्यामुळे नारायण राणे अस्वस्थ झाले आहेत. सरकारने विविध पॅटर्नचा अभ्यास करून सर्वांशी चर्चा करुन मुंबई वाचवण्याची गरज आहे. नारायण राणे यांची मागणी जनतेच्या हितापोटीच असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.


मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत राज्य सरकार अपयशी ठरले असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणेंची मागणी आहे. मात्र राणेंची ही मागणी वैयक्तिक असून त्यांनी ती महाराष्ट्रातील जनतेच्या हितापोटीच केली असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.


कोरोना संकटामुळे मुंबई अडचणीत असल्याचे बघितल्यावर नारायण राणे अस्वस्थ झाले आहेत. मुंबई महापालिकेकडे असणाऱ्या मुदत ठेवी जनतेच्या हितासाठी वापरण्याऐवजी राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने विविध पॅटर्नचा अभ्यास करण्याची गरज आहे. यासंदर्भात आपली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.


काय म्हणाले होते नारायण राणे?


कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे  सर्व वैद्यकीय सेवा, रूग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत नारायण राणे यांनी मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता.


महाविकास आघाडी सरकारची कोरोनाशी सामना करण्याची क्षमता नाही. राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.


VIDEO | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा 'ठाकरे' सरकारवर हल्लाबोल