सिंधुदुर्ग : आपला गड अभेद्य राखण्यात नारायण राणेंना यश आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आपलंच वर्चस्व असल्याचं नारायण राणेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. गेली 20 वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. यंदाही एकहाती विजय मिळवत राणेंनी बालेकिल्ल्यातील आपली ताकद दाखवून दिली आहे.  पहिल्यांदाच तिरंगी लढत जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी 27 जागांवर विजय मिळवत सिंधुदुर्गात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गेली 20 वर्ष नारायण राणे विरुद्ध इतर सर्व पक्षीय अशी थेट लढत होती. मात्र, या वर्षी शिवसेना-भाजप यांच्यात युती नसल्याने जिल्ह्यात तिरंगी लढत होती. दीपक केसरकरांना राणेंचा धक्का, तर कणकवलीतही वर्चस्व सावंतवाडीत दीपक केसरकारांना जोरदार धक्का देत काँग्रेसने सावंतवाडीत 5 जागांवर वर्चस्व घेत दीपक केसरकारांना धक्का दिला. सावंतवाडीतल्या 9 जागांपैकी 5 उमेदवार काँग्रेसचे निवडून आल्यामुळे दीपक केसरकारांना सावंतवाडीत धक्का मानला जातो आहे. तर कणकवलीत जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यामुळे कणकवलीत नारायण राणेंचे वर्चस्व दिसून आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल (एकूण जागा - 50) :
  • काँग्रेस - 27
  • शिवसेना - 16
  • भाजप - 6
  • राष्ट्रवादी - 1
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही राणेंचा गड अभेद्य! सिंधुदुर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, राणेंच्या ताकदीपुढे मुख्यमंत्र्यांची सभा फोल ठरली, असंच चित्र निकालावरुन दिसते आहे. तरी भाजपच्या जागा मात्र दुपटीने वाढल्या आहेत. गेल्यावेळी 3 जागा भाजपच्या नावे होत्या, त्या आता 6 झाल्या आहेत. मात्र, राणेंना मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही भाजप राणेंना टक्कर देऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्गात 10 जागांवरुन 1 जागेवर आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राष्ट्रवादीची कमालाची पिछेहाट झाली आहे.